वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत देणार- पालकमंत्री सतीश जारकीहोळी

निपाणी (प्रतिनिधी); निपाणी शहरात १३ मे रोजी झालेल्या वादळी वारा पावसाने सुमारे ५६ घरांसह म्युनिसीपल हायसस्कूल, विद्यामंदिर या शाळांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत तालुका प्रशासनाने सव्र्व्हेक्षण करून नुकसान ग्रस्तांची यादी कर्नाटक सरकारकडे पाठविली आहे. लवकरच कर्नाटक शासनाकडून त्यांना भरपाई देण्यात येईल अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी दिली. ते ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते.

       प्रारंभी निपाणी शहरात वादळी, वारा पावसाने नुकसान झालेल्या शिवाजी नगर, म्युनिसीपल हायस्कूल, भीम नगर, विद्यामंदिर परिसरात भेट दिली. यावेळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून पालकमंत्र्यांना विद्यामंदिर शाळेच्या पत्र्याच्या शेडच्या तक्रारी करून शेड पडून तीन दिवस झाले तरी शाळेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. घरांची मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एका महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. असे सांगून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

      पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले, पावसामुळे निपाणीत या वादळी वाऱ्याने ५४ घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील सुमारे १८३ विद्युत खांबे तुटली आहेत. टी.सी. खराब झाले आहेत. त्याची पूर्तता हेस्कॉमकडून करण्यात आली लवकरच सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत होईल. लवकरच तालुका प्रशासनाकडून पाणी समस्या निवारण्यात येईल. तसेच नुकसान भरपाई वाटप करण्यात येईल.

           यावेळी लोकसभा निवडणूकीतील मतदानाबाबत विचारणा केली असता निवडणूकीत आपला विजय निश्चित असल्याचे सांगून चांगले मताधिक्य मिळेल असे सांगून प्रज्वल रेवण्णा यांना भारतात कधी आणणार या प्रश्नावर ते म्हणाले, संबंधित तपास यंत्रणा योग्य पध्दतीने काम करीत आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल.

यावेळी माजी आम. काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, बुडा चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे, नगर नियोजन अध्यक्ष निकू पाटील, राजेश कदम, रोहन साळवे, राजू वड्डर, प्रविण सडोलकर, बसवराज पाटील, विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राज पठाण, बाळासाहेब देसाई सरकार, विलास गाडीवडर, डॉ. जसराज गिरे, फारूक गवंडी, रविंद्र श्रीखंडे, किरण कोकरे, बख्तियार कोल्हापूरे, प्रतिक शहा, प्रमोद पाटील, जरारखान पठाण, जावेद काझी, अब्बास फरास यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

पालकमंत्र्यांसमोर दोन गटात राडा

पालकमंत्र्यांनी वार्ड नं. २४ विद्यामंदिर जवळ भेट दिली असता वार्ड २४ नगरसेवकाच्या विरोधात तेथील नागरीकांनी तक्रार केली आहे. तर, नगरसेवकाला मानणाऱ्या गटाने नगरसेवकाच्या बाजूने त्यांचे काम चांगले असल्याचा खुलासा केला, यावेळी विद्यमान नगरसेवक व काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी आक्षेप घेतला. यावेळी हमरी-तुमरी होवून राडा झाला. हा प्रसंग शिवीगाळीपर्यंत प्रसंग गेला. यावेळी कांहिनी मध्यस्ती करून विषय मिटविण्याचा प्रयत्न केला तर पालकमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत लोकांच्या समस्या ऐकण्याकडेच लक्ष दिले.

About The Author