भाजपाला धक्का कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा
गारगोटी (प्रतिनिधी)– ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडून येत आहेत,आज भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राहुल बजरंग देसाई यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपाला पहिला धक्का दिला, वरिष्ठांनी याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्षपदी सरचिटणीस नाथाजी पाटील यांची नव्याने नियुक्ती केली, विशेष म्हणजे देसाई व पाटील दोघेही भुदरगड तालुक्यातीलच आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये अनेक जण नाराज असल्याची चर्चा होती,भुदरगड तालुक्यात भाजपा तर एक नव्हे दोन नव्हे तर तीन गटात विभागली होती,प्रत्येक गटाचे सवतेसुभे पहायला मिळत होते,भुदरगड भाजपा एकत्र कधीच नंदली नाही. राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा भुदरगड तालुका असतांना त्यांनीही या भाजपातील सर्व गटांना एका जाजमावर एकत्र आणता आले नाही. प्रत्येक गटाचे वेगळे कार्यक्रम होत होते, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपामध्ये सत्ताधारी आणि विरोधी आघाडी अशी विभागणी झाली होती,
जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सत्ताधारी आघाडीकडून निवडून आले, तर भाजपचे नाथाजी पाटील हे विरोधी आघाडीकडे राहिले, त्यांचा पराभव झाला.भुदरगड तालुक्यात भाजपा पक्ष वाढविण्यासाठी कोणीच लक्ष दिले नाही, ना चंद्रकातदादा पाटील यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या पुढे मागे करण्यात अनेकांनी धन्यता मानली ,आणि आता या गोष्टीचा स्फोट झाला आणि राहुल देसाई यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची पावले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडे वळू लागली आहेत, राहुल देसाई हे घाटगे यांचे समर्थक आहेत,कदाचित त्यामुळेच देसाई यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. देसाई यांच्या राजीनाम्यानंतर लगेच नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाजी पाटील यांची आजच निवड करून पक्षाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.