कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या स्पर्धा

0
कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या स्पर्धा

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कोल्हापुरात पाडव्याच्या दिवशी पारंपरिक म्हशींचा सौंदर्य सोहळा उत्साहात पार पडला. नटलेल्या म्हशी, शर्यती, कृतज्ञता आणि प्रेमाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.  दिवाळी पाडव्याच्या शुभप्रसंगी कोल्हापुरात परंपरेनुसार साजरा होणारा म्हशींचा सौंदर्य सोहळा यंदाही रंगतदार पद्धतीनं साजरा झाला. कसबा बावड्यातील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भारतवीर मित्र मंडळातर्फे करण्यात आलं होतं.

       या दरम्यान हलगीचा गजर, शिंगांवरील मोरपीस, पायात वाजणाऱ्या घुंगरांचा ठेका आणि चमकणारे चांदीचे तोडे अशा थाटात नटलेल्या म्हशींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. प्रत्येक मालकाने आपल्या म्हशींना आकर्षकरित्या सजवून स्पर्धेच्या मैदानात उतरविल्या होत्या. काही म्हशींवर विविधरंगी नक्षीकाम तर काहींच्या अंगावर सामाजिक संदेश रेखाटले होते.

      सोहळ्याची सुरुवात पंचगंगा नदीवर स्नान विधी करुन करण्यात आली. त्यानंतर सजवलेल्या म्हशींना मैदानात आणत म्हशी पळवण्याच्या शर्यती झाल्या. मोटरसायकलमधून येणाऱ्या आवाजामागं म्हशी पळवत तरुणांनी आपली कला आणि कौशल्यं दाखविली. आपली जनावरे वर्षभर आपल्यासाठी श्रम करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच मालकाचे जनावराप्रती असणारे प्रेम आणि जनावराचे मालकाप्रती असणारं प्रेम दाखवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो, अशी भावना आयोजक निलेश पिसाळ यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. तर कोल्हापूरकरांसाठी ही फक्त स्पर्धा नसून म्हशींप्रती प्रेम आणि नात्याचा उत्सव असल्याची भावना म्हशींच्या मालकांनी बोलून दाखवली.

         या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर आदींनी भेट देऊन म्हैशींच्या मालकांना प्रोत्साहन दिले. आमदार सतेज पाटील यांनी तर स्वतः गाडी चालवत म्हैस पळविली. तसेच समृद्धी इंगवले या तरुणीने दुचाकी मागे म्हैस पळवत परंपरा जोपासली.

         कसबा बावड्यासह शनिवार पेठे, पंचगंगा घाट, सागरमाळ आणि पाचगाव याठिकाणीही अशा स्पर्धा आयोजित केल्या. म्हशींचा थाट-माट पाहण्यासाठी आणि शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली. पाडवा म्हणजे दिवाळीच्या सणाला जोडलेल्या ग्रामीण संस्कृतीचं दृश्य कोल्हापुरात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. शेतकरी आणि म्हशींचे एक आगळं-वेगळं नात आहे. म्हशींना शेतकरी त्यांच्या घरचीच सदस्य मानतात. दूध उत्पादनामुळे शेतकऱ्यांना संसार चालवण्यासाठी त्यांची मोठी मदत होते.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *