उद्योग क्षेत्रावर विशेष भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प सादर
प्राचार्य. डॉ.तेजस्विनी मुडेकर, कमला कॉलेज, कोल्हापूर.
कोल्हापूर,(प्रतिनिधी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये उद्योग क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे. आयातीवरची निर्भरता कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढीवर भर दिला आहे .चामडे व कापड उद्योगातील निर्यात शुल्कात कपात केल्याने या उद्योगांना चालना मिळणार आहे .काजू आणि कोको ला जागतिक ब्रँड बनवणार असल्याने या उद्योगातील उत्पादन व प्रक्रिया यांना चालना मिळू शकते. भारताला टुरिझम केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट असल्याने पर्यटन उद्योग विकसित होईल. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढविण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘पायाभूत सुविधा फंड’ची स्थापना केली जाणार आहे.
12.2 लाख कोटी रुपये शहर विकासावर खर्च केले जाणार आहेत, त्यामुळे ऊर्जा, स्टील ,सिमेंट यासारख्या उद्योगांना चालना मिळेल.भारताला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवीत असताना पाच मेडिकल हब्ज तयार करण्यात येणार असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित रोजगार निर्मितीत वाढ होऊ शकते सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगाला चालना दिली जाणार असून हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामविकास अभियान राबवले जाणार आहे.
भारत क्रीडा साहित्य निर्मितीचे हब केले जाणार आहे. एम.एस. एम. इ. साठी सात लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. औषधनिर्मिती चे केंद्र भारताला बनविण्याचे उद्दिष्ट असल्याने औषध निर्माण क्षेत्र विकसित होऊ शकते क्लाऊड सर्विसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्त करण्यात आल्याने या कंपन्या आकर्षित होऊ शकतील एकंदरीतच उद्योग क्षेत्र विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला असल्याने त्या अनुषंगाने रोजगार निर्मितीत वाढ होऊ शकते.


