वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा- समित कदम
आरग ते पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना छत्री वाटप
मिरज (प्रतिनिधी)
आषाढी वारी यात्रेनिमित्त आरग ते पंढरपूर पायी जाणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या पुढाकारातून छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना समित कदम म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी पायी चालत जातात. त्यांच्या सेवेत योगदान देता आले, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. समाजकार्य आणि वारकरी सेवेला आम्ही नेहमीच प्राधान्य देत राहू.” वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देत, वारी ही केवळ परंपरा नसून समाजाला एकत्र आणणारी भक्तीची चळवळ असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आरग गावचे नेते एस. आर. बापू पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत सुरक्षित आणि आनंदी वारीसाठी शुभेच्छा दिल्या.


