निपाणीत गुन्हेगारी विरोधात पोलिसांची धडक कारवाई-तलवार-बुलेट जप्त ः संशयितांच्या घरांची झडती

निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-
शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी बुधवारी सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या घरांवर छापे मारण्यात आले.या कारवाई दरम्यान तलवार आणि एक नोंदणी नसलेली बुलेट बाईक जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार राबविण्यात आलेली ही कारवाई शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.15 पेक्षा अधिक घरांची तपासणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत निपाणी शहरपोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे शिवराज नाईकवडी, खडकालाट पोलीस ठाण्याच्या कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 40 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांंनी पहाटेच्या वेळी शहराच्या विविध भागांत मोहीम राबवली आणि 15 ते 20 सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी केली.त्यांच्या हालचाली,संपर्क आणि अवैध कृत्यांमधील सहभागाबद्दल माहिती गोळा करण्यात आली.कारवाईदरम्यान अरबाज मुल्लाच्या घरातून एक तलवार सापडली आणि पोलिसांनी ती जप्त केली. तसेच, शैलेंद्र बोदले यांची एक नोंदणी नसलेली बुलेट बाईकही जप्त करण्यात आली.जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी सुरू असून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
कारवाईनंतर मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी, शहरात गुन्हेगारी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. गांजाची वाहतूक, विक्री, अवैध शस्त्रे, दहशत, खंडणी आणि इतर कोणत्याही अवैध कारवायांमध्ये कोणीही सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.अलीकडच्या काळात, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीस विविध शहरांमध्ये विशेष मोहिमा राबवत आहे.अशा अचानक धाडींमुळे गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांवर केवळ मानसिक दबावच निर्माण होत नाही, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मदत होते. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या काही दिवसांत अशा विशेष मोहिमा सुरूच राहतील, असे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर सतत पाळत ठेवली जात असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, अशी नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. या जलद कारवाईद्वारे पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. गुन्हेगारी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षा हे त्यांचे प्राधान्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.


