राजपुरात बंधारा पाण्याखाली: नदीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ
सैनिक टाकळी (प्रतिनिधी):
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा यावर्षी पहिल्यांदाच पाण्याखाली गेल्यामुळे धरणावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पावसामुळे तालुक्यातील इतर सर्व बंधारेही यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत.

यावर्षी वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या, तसेच दूधगंगा नदीचे पात्रही उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे झाले होते.
मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरीही, नदीपात्रातील वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


