वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती – उद्योजक विनायक यादव
अन्नदानाच्या सेवेची १५ वर्षांची परंपरा कायम
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
आषाढी वारीनिमित्त मिरज शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील परीट गल्लीत गेल्या १५ वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू असलेली अन्नदानाची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. उद्योजक विनायक यादव व त्यांच्या बंधूंच्या पुढाकारातून आयोजित या सेवा उपक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ४०० ते ५०० वारकरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी वारकऱ्यांसाठी भोजनाची संपूर्ण व उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विविध भागांतून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी बोलताना विनायक यादव म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणासोबत समाजसेवेची भावना जपणे हेच आमचे ध्येय आहे. गेली १५ वर्षे ही सेवा अखंडपणे सुरू असून, पुढील काळातही ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पुण्य आहे.” या सेवा उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि परीट समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी योगदान दिले. विठ्ठलभक्ती, समाजसेवा आणि अन्नदानाचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम मिरजमधील एक प्रेरणादायी परंपरा म्हणून ओळखला जात आहे.


