कर्नाळमध्ये नवी सांगली वसवणे आवश्यक – समित कदम

कर्नाळमधील काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा ‘जनसुराज्य’मध्ये प्रवेश
मिरज (प्रतिनिधी)
वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे सांगलीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पायाभूत सुविधांचा अभाव ही चिंतेची बाब आहे. यामुळे कर्नाळमध्ये नवी सांगली वसवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नाळ मधील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘जनसुराज्य’मध्ये प्रवेश यावेळी ते बोलत होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे इतर पक्षांतील असंख्य नेते, पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत.
आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावचे माजी उपसरपंच आणि काँगेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासीर चौगुले यांच्यासह समीर मुल्ला, पोपट मंगसुळे, रघुनंदन उर्फ नाना घोरपडे, किरण कदम, सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्यमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडला. गावाच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर, पुजारी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, शहराध्यक्ष डॉ. पंकज म्हेत्रे, जिल्हा संघटक सलीम पठाण, ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, सुशांत काळे, अल्ताफ रोहिले, जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.