कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन सरकारने शेतकऱ्यांना फसवले ; आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

आष्टा (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून मतांचा जोगवा मागित महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप महायुती सरकारने केले आहे, खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असे निवेदन आष्टा शहर युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आष्टा अपर तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे आष्टा शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, माजी नगरसेवक दीपक मेथे, प्रभाकर जाधव, सयाजी गावडे, शशिकांत भानुसे, गोटू थोटे, टिप्पू आत्तार, प्रकाश सिद्ध उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना ही सरसकट महिलांना सुरु केली . सत्ता आल्यानंतर आता लाखो महिलांना योजनेतून वगळण्याचं लाजीरवाने कृत्य या सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये वरुन 2100 रुपये देतो म्हणून या सरकारने घोषणा केली, आश्वासन दिले, आज सत्ता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडण्याच पाप सरकार करीत आहे. यातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र असंतोष नाराजी आहे.शेतकऱ्यांना, महिलांना न्याय मिळावा, सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी,महिलावर्ग गप्प बसणार नाही, तेंव्हा सरकारने कर्जमाफी बाबत पुनरवीचार करून शेतकरी, महिलांना न्याय द्यावा. राष्ट्रवादी तर्फे फसव्या महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.