आरगेतील बौद्ध समाजबांधवांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन – डॉ.कांबळे

सांगली (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये बौद्ध समाजावर हल्ला करत संघटीतपणे दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी सह इतर समाज कंटकांच्यावर झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत आणि अट्रोसिटी कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन डॉ.महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली समस्त आंबेडकर समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. आरोपींवर कारवाई न झाल्यास १० एप्रिल रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरग मध्ये वेगवेगळ्या समाजातील तरुणांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संदीप नाईक आणि सदाशिव नाईक यांची टोळी करत आहे. तसेच नाईक यांच्या समाजातील वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या तरुणांना धारदार हत्यारे , काठ्या , दगडे घेऊन आरग गावामध्ये एकत्रित करून बौद्ध समाजातील पृथ्वीराज कांबळे आणि इतर समाज बांधवाना समाजात घुसून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे.
याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख संदीप घुगे आणी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे कार्यतत्पर उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणिल गिल्डा आणि मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सिद यांनी संबंधित दोषीवर तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे मात्र त्यामधील 12 आरोपी हे फरार आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावी तसेच 150 ते 200 हुन अधिक आरोपी सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा हत्यारे हवेत फिरवून गल्लीमध्ये जमाव बनवून आणि घुसून समाजातील दिसेल त्या तरुणांना व महिलांना शिवीगाळ व मारहाण केलेली आहे त्यामुळे नंबर FIR – 0171 / 2025 ने बारा आरोपीसह त्यादिवशी कृत्यांमध्ये व समाजावर हल्ला करणाऱ्या इतर सर्व आरोपींना सुद्धा यावर नमूद गुन्ह्यात आरोपी करुन सर्व समाजकंटकावर झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत व ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.