मिरज सुधार समिती म्हणजे नागरिक व प्रशासनातील दुवा- पृथ्वीराज पाटील

सुधार समितीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण
मिरज (प्रतिनिधी)
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मिरज सुधार समितीनेही त्यांची वेबसाईट सुरू केली आहे. सामान्य सांगलीकर व मिरजकर नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून मिरज सुधार समिती काम करेल, असा मला विश्वास वाटतो. सुधार समितीने आता त्यांचे व्हिजन मोठे करून पुढे गेले पाहिजे. भविष्यात आपले शहर अधिक चांगले कसे होईल याच्या कल्पना घेऊन आता आपण काम केले पाहिजे. त्यासाठी नागरिकांसोबत संवाद वाढवला पाहिजे, विविध क्षेत्रातील तज्ञांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व मिरजेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.
मिरज सुधार समितीच्या अधिकृत संकेत स्थळाचे उद्घाटन दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगारदिनाच्या निमित्ताने झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते, हृदयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, माजी महापालिका कर अधीक्षक नितीन शिंदे, एडवोकेट इर्शाद पालेगार, मिरज सुधार समितीचे संस्थापक एडवोकेट ए. ए. काजी, समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, जहीर मुजावर, असिफ निपाणीकर, राकेश कोळेकर, आयुब निशानदार, नरेश सातपुते, रामलिंग गुगरी यांच्यासह मिरज सुधार समितीचे सदस्य मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत सुधार समितीकडून माहिती देण्यात आली की, सुधार समिती २० वर्षांपासून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत आहे. समितीने आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून सुविधा देण्यात आली आहे. मिरजेतील विविध शासकीय कार्यालयाचे तसेच अत्यावश्यक संपर्क क्रमांक, मिरजेसंदर्भातील विविध माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. त्याचा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, अनेक संस्था स्थापन होतात त्या कागदावरच राहतात. काही महिने चालतात. मात्र सुधार समितीचे काम मागील दोन दशकांपासून निरंतरपणे सुरू आहे. वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या धर्मातील, समाजातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील, व्यवसायातील लोक एकत्र येऊन मिरज सुधार समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांना मदत करत आहेत. या कामासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मिरज शहराचा वारसा, येथील वैद्यकीय सुविधा यामुळे शहराची ओळख आहे. तसेच मिरज सुधार समितीनेही त्यांच्या कामातून आणि संघर्षातून ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.