बागडी समाज बांधवांच्या जीवनात उजडली दिवाळीची पहाट ; तुंग गावातील पाच भूमीहीन कुटुंबांना जागा व घरकुल मंजूर
मिरज (प्रतिनिधी)
वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बागडी समाज बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे. तुंग गावातील पाच भूमीन कुटुंबांना शासकीय जागा आणि घरकुल मंजूर करण्यात आले आहे. सेवा पंधरवडा या मोहिमेअंतर्गत या भूमीहीन कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे या कुटुंबांच्या जीवनातील अंधकार संपून खऱ्या अर्थाने दिवाळीची पहाट उजाडली आहे. हक्काचे घरकुल उपलब्ध होत असल्यामुळे बागडी समाज बांधवांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी शंभर वर्षांपूर्वी येऊन राहिलेल्या बागडी कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्यामुळे झोपडी वजा, पत्राच्या घरात राहिलेला आहे. जागा नसल्यामुळे घर बांधता येत नाही अशी अडचण त्यांच्यासमोर होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या कुटुंबांना घरकुल मंजूर झाली. मात्र स्वतःची जागा नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना घरापासून वंचित रहावे लागते काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र मिरजेचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या पुढाकारांनी बागडी कुटुंबा समोर आशेचा किरण निर्माण झाला. या पाच कुटुंबांना त्याच गावातील शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली. विविध एनओसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव सरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी लक्काप्पा सनदी, ग्रामपंचायत तुंग ग्राममहसुल अधिकारी, तुंग मंडल अधिकारी, संतोष इंगळे, ज्ञानदेव मडके, सुखदेव डोईफोडे यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे दिला.
सेवा पंधरवडा या मोहिमे अंतर्गत या पाच भूमिहीन कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 500 चौरस फूट जागा मंजूर करून देण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या लोकांना घरकुल बांधून देण्यात येणार आहे. जागा उपलब्धते बाबतचे प्रमाणपत्र आज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते बागडी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आले.
दिवाळीच्या मुहूर्तावर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बागडी महिला भगिनींनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे औक्षण करून त्यांचे आभार मानले. एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त करण्यात आला. भूमिहीन आणि घर नसलेल्या वंचित घटकातील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घर उपलब्ध करून दिले जात आहे याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे यावेळी बागडी समाज बांधवांनी आभार व्यक्त केले. यावेळी खंडू बागडी, गजानन बागडी, नागेश बागडी आणि समाजबांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.


