निढोरी मुख्य कालव्यास अखेर सोडले पाणी ः पिकांना जीवदान
निढोरी,ता.18(वार्ताहर)
‘दैनिक महासत्ता’मध्ये निढोरी परिसरातील भात पिके पाण्याअभावी संकटात आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, जलसंपदा विभाग कोल्हापूर (मुख्य शाखा निढोरी) येथील अधिकारी वर्गाने अत्यंत तत्परता दाखवत मुख्य कालव्यातून (कॅनॉल) शेतीसाठी पाणी सोडले आहे. प्रशासनाच्या या जलद कारवाईमुळे सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
16 सप्टेंबर 2026 रोजीच्या ‘दैनिक महासत्ता’च्या अंकात “पाण्याअभावी भात पिके धोक्यात, कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे, शेतकरी बांधवांची मागणी!“ अशा आशयाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या भागात पाऊस लांबल्याने आणि कालव्याला पाणी नसल्याने भात आणि ऊस पिके वाळून जाण्याच्या मार्गावर होती. शेतकऱ्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान आणि त्यांची बिकट अवस्था या बातमीच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात आली होती.कालव्यातून खळाळत आलेले पाणी पाहताच निढोरी पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांनी भात व ऊस पिकांना पाणी देण्यासाठी शेतात एकच लगबग सुरू केली आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव आणि कृतज्ञता‘दैनिक महासत्ता’ने सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल निढोरी पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी आणि शेतकरी संघटनांनी दैनिक महासत्ता परिवाराचे विशेष आभार मानले आहेत.


