आर्थिक व्यवहारात भूलथापांना बळी न पडणे महत्त्वाचे- दिपक क्षीरसागर

मिरज (प्रतिनिधी)
आज प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे महत्त्वाची बाब आहे. सध्या फसवणुकीचे विविध प्रकार सामोरे येत आहेत. मोबाईलवर नवनवीन लिंक येत आहेत. त्या ओपन करून डाऊनलोड करताच खात्यातील रक्कम नाहीशी होते. यामुळे नागरिकांनी विशेषतः महिला वर्गांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे आर्थिक साक्षरता अधिकारी दिपक क्षीरसागर यांनी व्यक्त केले. मिरजेत पद्मावती रेणुका सखी महिला बचत गट मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
मेळाव्यास पद्मावती रेणुका सखी महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. क्षीरसागर यांनी बँकेच्या व शासकीय विविध योजनांच्या बद्दल माहिती देत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यासह इतर बाबी सोदाहरण स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित्रा दरवंदर यांनी केले तर संगीता बोरगाव यांनी आभार मानले.