प्रगतीसाठी नाभिक बांधवांची एकी महत्त्वाची – रवी बेलपत्रे

महामंडळाच्या सांगली शाखेकडून आयोजित वधू-वर मेळाव्यास प्रतिसाद
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
काळाच्या ओघात नाभिक समाज प्रगतीपासुन वंचित राहतोय. समाजाला एकत्रित लढा देण्याची गरज आहे. व्यवसाय, नोकरी, मुलांची लग्ने असे अनेक विषय समाजासमोर उभे आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनही सकारात्मक आहे. मात्र आपण सर्वांनी याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. विशेषतः नाभिक व्यवसाय करणाऱ्या मुलांची लग्ने वेळेत होत नाहीत हा मुद्दा ऐरणीवर आला असून याकरिता वधू-वर मेळाव्याची व्यापकता वाढवावी लागेल, असे प्रतिपादन नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष रवी बेलपत्रे यांनी केले. महाराष्ट्र महामंडळाच्या नाभिक सांगली शाखेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय मोफत वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मेळाव्यास सांगली, कोल्हापूर व साताऱ्यासह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य महिला अध्यक्षा माधुरी पारपल्लीवार, सिद्राम रुद्र, संजीव साळुंखे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, संतोष पाटील, सूरज बिजली यावेळी उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त संजयनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश झेंडे यांनी केले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, अशोक घुळघुळे, शरद झेंडे, अनिल काशिद, गोकुळा झेंडे, मारुती सपकाळ, हेमंत काळे, प्रशांत साळुंखे, अनिल काशीद, बाळासाहेब अस्वले, राजू खराडे, बाळासाहेब साळुंके व सदस्यांनी संयोजन केले. आभार जनार्दन झेंडे यांनी मानले. याप्रसंगी मोहन सपकाळ यांचाही गौरव करण्यात आला.