मिरज जंक्शनचा विकास का होत नाही ? रेल्वे महाव्यवस्थापकांना घेराव घालत सुधार समितीकडून प्रश्नांचा भडीमार

मिरज (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाचे जंक्शन असून सुध्दा मिरज जंक्शनचा विकास का रखडला आहे? असा सवाल करत मिरज सुधार समितीच्या कार्यकत्र्यांंनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना घेराव घातला. सुधार समितीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्राने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. मागण्यांचे निवेदन महाव्यवस्थापकांना देण्यात आले. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा उपस्थित होते.
मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना हे मिरज-कोल्हापूर परिक्षण दौऱ्यावर आले असता, मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, जहीर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, वसीम सय्यद, अभिजीत दाणेकर आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांंना भेटण्यासाठी गेले असता, रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत, बेळगाव, हुबळी, कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा विकास होतो. मग, मिरजेचा विकास का खुंटला आहे? असा सवाल केला. मिरजेत पिटलाईनचे काम पुर्ण झाले असताना पुणे स्थानकाच्या गाड्या मिरज पर्यत विस्तार करण्याची मागणी केली. तसेच, कोरोना काळात बंद केलेल्या कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, मिरज-बेल्लारी एक्स्प्रेस, कोल्हापूर-हैेद्राबाद एक्स्प्रेस सुरु करण्याची, कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस पनवेलमार्गे मुंबईला सोडण्याची आणि मिरज-परळी या गाडीला पूर्वी प्रमाणे रेग्युलर पॅसेंजर बोगी व स्लिपर बोगी बसविण्याची मागणी केली. तसेच, मिरज जंक्शनवरील फ्लॅटफॉर्म क्रमांक २, ३, ४ आणि ५ वरील निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच महाव्यवस्थापकांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच झापले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले. मिरज मॉडेल स्टेशन संदर्भात प्रक्रीया सुरु असल्याची माहिती महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कार्यकर्त्यांना दिली.