आष्टा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी : शिवसेनेची मागणी

…. अन्यथा याप्रसंगी उपोषण करू : राकेश आटूगडे
आष्टा (प्रतिनिधी)
नागरिकांच्या कामांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेले अन अनेक महिन्यापासून रजेवर असलेले आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची बदली करावी, तात्काळ त्यांच्या जागी नवनियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने, जिल्हाधिकारी, व नगरविकास मंत्रालयाकडे केली आहे अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख राकेश आटूगडे यांनी दिली. यावेळी डॉ नंदकिशोर आटूगडे, सागर चव्हाण, उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, २०२१ सालापासून आष्टा नगरपालिकेत प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतात तर पालिकेचे मुख्याधिकारी सहाय्यक प्रशासक दिसतात. गेल्या अनेक महिन्यापासून संबंधित मुख्याधिकारी हे रजेवर आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे,शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रभारी मुख्याधिकारी नियुक्त असून देखिल पुरेशा अधिकाराअभावी नागरिकांची अनेक कामे तात्काळ होताना दिसत नाहीत. नागरिकांना एका कामासाठी पालिकेत अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. पालिका प्रशासनाच्या कारभारावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
अशातच आष्टा नगरपालिकेची निवडणुक आगामी काळात होणार असल्याने नगरपालिकेत राजकीय द्वेषाने अशोभनीय वाद विवाद होत आहेत. संबंधित मुख्याधिकारी हे सतत रजा वाढवून घेत आहेत. शहरात कोट्यावधीची विकास कामे सुरु आहेत. या कामावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही,तेंव्हा नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करावा. तरी सदर प्रश्न आठ दिवसात मार्गी न लागल्यास आम्ही आष्टा शहर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने आष्टा नगरपालिकेसमोर मुख्याधिकारी बदली व नवनियुक्ती यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा राकेश आटुगडे यांनी दिला आहे.