आष्ट्यात नगरपालिका टेंडर राड्यात भाजपाची “सरसी” राष्ट्रवादीची “मुरसी

“भाजप-राष्ट्रवादीत” संघर्षाची नांदी
आष्टा (प्रतिनिधी /तानाजी टकले)
आष्टा नगर पालिकेतील टेंडर भरण्यावरून भाजपा आणी राष्ट्रवादीत झालेल्या राड्याला आज यू टर्न अर्थात कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी समर्थक ठेकेदाराने पालिका प्रशासनाकडे माघारीचे पत्र देत सपशेल लोटांगण घेत मैदान सोडले. यामुळे राष्ट्रवादीने केलेल्या भाजपा विरोधी उठावाला अपयश आले असून या लढ्यात भाजपची “सरशी “तर राष्ट्रवादीची “मुरशी” झाली.
आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादी प्रणित आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता होती. नोव्हेंबर 2021 ला पालिका कौन्सिलची मुदत संपल्याने या ठिकाणी प्रशासक आहे. प्रशासक काळात भाजपा समर्थकांनी राज्यातील सत्तेचा सुयोग्य वापर करीत राष्ट्रवादीला शह देत,पालिकेत भाजपाचे बस्तान आवळले, विकास कामांत भाजपचे मार्केटिंग साधीत,शहरात बोलबाला केला.नागरिकांत विश्वास संपादित केला यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी समर्थकांनी झोपेचे सोंग घेत बघ्याची भूमिका घेत कानाडोळा केला. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर उमटला. बत्तीस हजार मतदाराच्या शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवारास केवळ ऐंशी मताचे मताधिक्य मिळाले अन राष्ट्रवादी समर्थ्यांकांच्या पाया खालची वाळू सरकली.
यानंतर मात्र सावध झालेल्या राष्ट्रवादी ने शहरातील भाजपच्या मनमानीला पायबंद घालणेच्या इराद्याने विरोध सुरु केला. याचाच पहिला आध्याय म्हणजे काल झालेला “टेंडरवाद राडा”.अर्थात ठेकेदारी. नगर पालिकेच्या वतीने सुमारे पस्तीस लाख रुपये अंदाजपत्रकीय सहा कामाच्या निविदा मागिवल्या होत्या. सर्व टेंडरे भाजपा समर्थकांनी भरली होती, याला शह देत राष्ट्रवादी समर्थकांनी टेंडर भरण्याची यंत्रणा उभी केली.यावेळी भाजपाचे प्रवीण माने राष्ट्रवादीचे संग्राम जाधव यांच्यात पालिकेतच अधिकाऱ्यांसमोर हमरी तुमरी हातघाई झाली. पालिकेत राडा झाला. यात लिफाफा गायब, ठेकेदाराचे अपहरण,मुदत टाइमझोन नाट्य रंगले, दरम्यान भाजपा समर्थकांनी राष्ट्रवादी समर्थकाचे अपहरण केल्याचा आरोप राष्ट्रवादी समर्थकांनी करीत पालिका प्रशासनाकडे मुदतवाढ,टेंडर प्रक्रिया निकोप, पारदर्शी करण्याची मागणी केली. पालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला.
२४ तास उलटण्या आधीच अपहरणाचा आरोप असणाऱ्या ठेकेदाराने आज पालिका प्रशासनाकडे लेखी पत्र सादर करीत, आपले अपहरण झाले नाही, टेंडर बाबत आपली तक्रार नसल्याचा अन निविदा प्रक्रिया निकोप असल्याचे लेखी पत्र देत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. या प्रकाराने राष्ट्रवादीची विरोधासाठी विरोधाची धार लढाई पूर्वीच बोथट झाली. मात्र जनता बुचकळ्यात पडली, असा कोणता डोस,असं कोणतं अक्रीत घडलं, टेंडरसाठी लंगोटा बांधलेल्या पैलवानाने कुस्ती आधीच मैदान सोडल..याची चर्चा झडत आहे. राजकीय संघर्ष्याच्या अध्ययाचं हे नाट्य, तक्रार नसल्या पर्यंत पोहचल असलं तरी प्रशासकीय दृष्ट्या सांगली जिल्ह्यात पोहचलेला हा टेंडर राडा,त्याला प्रशासक रिटेंडरिंग करणार, की मुदतवाढ देणार हे पाहावे लागणार आहे.. तूर्तास मात्र शहारात भाजपा राष्ट्रवादीचा मुद्द्यावरला संघर्ष गुद्द्यावर आल्याच्या फोडण्या फुटत आहेत.