बोलवाड जि.प.शाळेत उभारली पुस्तकांची गुढी ; गुढीपाडव्यादिनी पहिलीत बारा विद्यार्थ्यांचा प्रवेश

मिरज (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळा बोलवाड (ता.मिरज) येथे शाळेचे मुख्याध्यापक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाने ज्या विद्यार्थ्यांना सहा वर्ष पूर्ण होणार आहेत अशा मुलांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त शाळेमध्ये पाठ्यक्रमाची पुस्तके रचून पुस्तकांची गुढी तयार करण्यात आली. पालक व विद्यार्थ्यांसाठी ही गुढी आकर्षणाचे कारण ठरली.
सध्या जिल्हा परिषद शाळेमधील पट वाढत असून सुसज्ज भौतिक सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने किंबहुना सर्व शिक्षकांनी लक्ष केंद्रित केले असून सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा हा उपक्रम आता राज्य शासनाने स्वीकारला असून आता महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा हा उपक्रम राबविला जाणार आहे .ही सांगली जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून प्रत्येक कार्यात सांगली जिल्हा हा राज्याला दिशादर्शक ठरत आहे.
अशा स्थितीमध्ये पालकांचे उद्बोधन करून आपल्या मुलांना खाजगी शाळेकडे न पाठवता जिल्हा परिषद शाळेमध्येच पाठवा यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या शाळेची जाहिरात करताना दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाची गुढी उंच करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून त्यापैकी एक उपक्रम म्हणजे गुढीपाडव्या दिवशी इयत्ता पहिलीच्या मुलांना प्रवेश देणे व आत्तापासूनच इयत्ता पहिलीच्या वर्गात बसवून घेऊन त्यांचे वर्ग सुरू करणे. हा उपक्रम जिल्हा परिषद शाळा बोलवाड येथेही राबविला असून एकूण 28 दाखल पात्र मुलांपैकी गुढीपाडव्या दिवशीच बारा विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतला.
याप्रसंगी बोलवाड गावच्या सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण सर्वदे, मुख्याध्यापक अमोल माने यांनी पालकांचे आभार मानून विद्यार्थ्यांचे फुल, चॉकलेट व वही देऊन स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक अमोल माने, शिक्षक व परशुराम सलगरे, संतोष ढोले,सविता डांगे, शुभांगी पाटील, बाबासाहेब कणके यांच्यासह व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.