निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

0

निपाणी.ता.१६.( प्रतिनिधी) निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, मतदार संघाच्या हरित क्रांतीचे शिल्पकार व पहिले हॅट्रिकवीर आमदार श्री काकासाहेब पांडुरंग पाटील वय-,७० रा. वाळकी यांचे मंगळवार दि.17 रोजी रात्री दोन वाजता बेळगाव येथील
केएलई रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


अलीकडेच त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात मानेवरील शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे १५ दिवस उपचार सुरू असताना त्यांचा उपचारासाठी अल्प प्रतिसाद मिळत होता. अखेर 17 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
२५ नोव्हेंबर १९५५ साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी कणंगला जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातून पहिल्यांदा निवडणूक लढवत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केला. त्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.त्यानंतर मात्र काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी १९९९ ते २००४ व २००८ या सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या. आमदारकीच्या काळात त्यांनी महत्त्वकांक्षी असलेला काळमावाडी करार पूर्ण करून निपाणी भागात हरितक्रांतीचे स्वप्न साकार केले. तसेच निपाणी मतदारसंघाचे अस्तित्व राखण्यासाठी त्यांनी कुलदीप सिंह आयोगासमोर आपली भक्कमपणे बाजू मांडत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबरोबरच निपाणी तालुका निर्मितीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. होता.

कराड बेळगाव रेल्वे मार्गासाठी केंद्राकडे सातत्याने मागणी लावून धरली. निपाणी शहरासह मतदार संघात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी अनेक योजना राबवल्या. तसेच मतदार संघात विकास कामांची गंगा आणली. सभागृहात मतदार संघाच्या हिताच्या दृष्टीचे अनेक प्रश्न मांडून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच तंबाखू वरील व्हॅट रद्द करून उत्पादकांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना निवडून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. निपाणी मतदारसंघातून तब्बल ३० हजारांचे मताधिक्य मिळाले. एक मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते. कर्नाटक महाराष्ट्रसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुजय, मुलगी सुप्रिया,सून उमा, जावई दत्तकुमार, नातवंडे असा परिवार आहे. आज बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव बेळगाव निपाणी येणार आहे. निपाणी येथील मुनिसिपल हायस्कूल या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या वाळकी निवासस्थानी मिरवणूक काढून त्यांच्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *