संविधान हाच आदर्श ग्रंथ : डॉ. जगन कराडे
राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याची आपण पंच्यात्तरी साजरी केली. भारतीय संविधान स्वीकृतीला आज पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षानंतर आपली लोकशाही मजबूत स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे आपले संविधान. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या प्रदेशात संविधान लागू करणे तशी सोपी गोष्ट नव्हती. आपण संविधान केवळ लागू केले नाही तर त्या आधारे आपली लोकशाही यशस्वी करून दाखविली. एका अर्थाने हा जगातील एक मोठा प्रयोग होता तो भारतीय संविधानाच्या मदतीने यशस्वी झाला. म्हणून संविधान हाच आदर्श ग्रंथ आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. जगन कराडे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी कोल्हापूर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारतीय राज्यघटना आणि सामाजिक सलोखा ह्या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
ह्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. भारतीय संविधानाने सामाजिक समता प्रस्थापित करीत माणसाला जोडण्याचे काम केले. जर संविधान नसते तर सामाजिक सलोखा नसता आणि पर्यायाने माणसेसुद्धा नष्ट झाली असती. असे संविधान वाचावे, ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुखरूप जावे. यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूयात. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो.डॉ. डी. आर. भोसले यांनी व्यक्त केले.
ह्या व्याख्यानाच्या प्रारंभी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. मुल्ला यांनी महाविद्यालयास संविधानाच्या दोन प्रती भेट दिल्या. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. मुल्ला यांनी केले. सूत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. मुल्लाणी यांनी केले. ह्या व्याख्यानास विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, विविध विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


