भारत सरकारच्या योजनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी व्यावहारिक उपक्रमांची आवश्यकता – डॉ. क्रांतिकुमार पाटील
कमला कॉलेज मध्ये कॉमर्स फोरम अंतर्गत व्यापार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी) कमला कॉलेज वाणिज्य विभागातर्फे कॉमर्स फोरम अंतर्गत व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले भारत सरकारच्या “मेक इन इंडिया”, “स्टार्टअप इंडिया”, “स्किल इंडिया” सारख्या योजनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अशा व्यावहारिक उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. असे मत डाँ. पाटील यांनी मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित केले आणि विद्यार्थ्यांनी दर्शविलेल्या सर्जनशीलतेचे अभिनंदन केले.
मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी केले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उद्योजकत्व भावनेचे कौतुक केले. पुढे त्या म्हणाल्या आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञानच पुरेसे नाही, तर व्यावहारिक कौशल्ये, नवनिर्मितीची वृत्ती आणि उद्योजकत्वाची भावना विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. मेळाव्यांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांच्यामध्ये नोकरी शोधण्याऐवजी नोकऱ्या निर्माण करण्याची मानसिकता तयार होते.
व्यापार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व्यवहारज्ञान व वास्तविक व्यावसायिक वातावरणात काम करण्याचा अनुभव मिळवला. विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये असलेली उद्योजकत्वाची क्षमता ओळखण्याची, त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची आणि भविष्यातील यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःला तयार करण्याची अमूल्य संधी प्राप्त झाली. यामुळे त्यांचे नेतृत्व कौशल्य, संघटना कौशल्य, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता यामध्येही वृद्धी झाली.
या उपक्रमामुळे कॉमर्स विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय पाऊल उचलल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विशेषतः ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे हे अत्यंत सराहनीय आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
व्यापार मेळाव्याच्या आयोजन करताना वाणिज्य विभागाच्या सर्व प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे परिश्रम घेतले. भविष्यात अशा व्यावहारिक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना उद्योजकत्वाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे नियोजन कॉमर्स विभागाने केले आहे. या मेळाव्यातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून विद्यार्थी भविष्यात स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतील आणि समाजात बदल घडवून आणू शकतील, अशी आशा व्यक्त केली.
व्यापार मेळाव्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्वपूर्ण योगदान दिले. उद्योजकत्व, नवनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम व्यापार मेळाव्याने केले.


