सौजन्याने वागण्याच्या सूचनांना हरताळ; करवीर पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारांचा अजब नियम

0
karveer

कोल्हापूर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमी दिल्या जातात. मात्र करवीर पोलिस ठाण्यात सोमवारी या सूचनांना हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला. ठाणे अंमलदार सागर उगळे यांनी तक्रारदारांना चप्पल-बूट बाहेर काढूनच केबिनमध्ये येण्याची सक्ती केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चप्पल घालून आत गेलेल्या काही तक्रारदारांना त्यांनी खेकसून बाहेर पाठवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.

सोमवारी करवीर पोलिस ठाण्यात सागर उगळे हे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. पोलिस ठाण्यात पोहोचणाऱ्या व्यक्तींचा सर्वप्रथम संपर्क ठाणे अंमलदारांशीच होत असतो. चौकशीपासून ते फिर्याद नोंदविण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ठाणे अंमलदार हा तक्रारदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्यामुळे पोलिस ठाण्याचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वर्तनावरूनच नागरिकांना पोलिस दलाच्या एकूण वागणुकीचा अंदाज येत असतो.

मात्र सोमवारी उगळे यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत स्वतःचाच वेगळा नियम लागू केला. त्यांच्या केबिनमध्ये येणाऱ्या तक्रारदारांना त्यांनी पोलिस ठाण्याबाहेरच चप्पल-बूट काढण्यास सांगितले. काही तक्रारदार घाईगडबडीत चप्पल घालून केबिनमध्ये गेले असता त्यांनी त्यांच्यावर खेकसत बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे काही तक्रारदारांना बाहेरच थांबावे लागले, तर काहींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिस ठाण्यात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच अशा प्रकारचा नियम लावल्याने काही काळ तक्रारदारांची अडवणूक झाली. पोलिस ठाणे हे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचे ठिकाण असताना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *