पावसाची उघडीप : भात कापणीला जोर
कोल्हापूर. (प्रतिनिधी): पावसाने ब-यापैकी उघडीप दिली असल्यामुळे कोल्हापूर जिल्हयाच्या पूर्व भागात भात काडणीला जोर आला आहे, गेल्या वर्षभरात अचानकपणे पडत असलेल्या पावसाळी व अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून मिळेल त्या कामगारांच्या मदतीने तसेच घरातील अबालवृध्दाच्या मदतीनेही भात काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. सारं गाव आता शेतात पहायला मिळत आहे.
भात, सोयाबीन, शेंगांच्या काढणीच्या कामामध्ये मजूर मिळत नसल्याने घरातील माणसांच्या मदतीने काढणी चालू आहे काही ठिकाणी यंत्राचा वापरही केला जात आहे. शेतीत यांत्रिकीकरण आल्यामुळे पारंपरिक पद्धतीने भाताची खळ्यावरती मळणी करणे जवळपास बंद झाले आहे. पण सततच्या पावसामुळे यंत्राचा वापर करण्यास अडथळा निर्माण होत आहे, अचानक ढगाळ वातावरण होणे त्यानंतर मोकळे वातावरण असा वातावरणात लपंडाव चालू असला तरी काढणीला आलेली पिके काढूण मळणी केली जात आहे. वातावरणातील बदल यामुळे शेतक-यांचीही घालमेल होत आहे. भुईमूग काढून वाळवला जात आहे, ढगाळ वातावरण झाल्यास शेतक-यामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे.
नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात खरीप हंगामातील काढणीस सुरुवात झाली असली तरी सततच्या पावसामुळे ती मंदावली आहे. खरीप हंगामातील पीक काढणीस गती येते, विशेषतः भात, सोयाबीन, भुईमूग आणि ऊस यांसारख्या पिकांची कापणी सुरू होते. मात्र, अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शिवारात पाणी साचले आहे. भातशेतीत पाण्यामुळे मळणी करता येत नाही, परिणामी काढणी अडथळा येत आहे. काढणीस तयार असलेली पिके पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. ऊस कापणीसाठी शेत सुकण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे, जमीन ओली असल्या मुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामही लांबण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे पावसाळी पिके काढणीची गती मंद राहू शकते.


