सहकारी बँका सावकारी दूर ठेवण्यासाठी एकमेव पर्याय – – पालकमंत्री प्रकाश आबीटकर
कोपार्डे (प्रतिनिधी) :सावकारी दूर ठेवण्यासाठी सहकारी बँका एकमेव पर्याय आहे. सहकारातून समृद्धी कडे घेऊन जाण्यासाठी नरके घराण्याचे मोठे योगदान आहे. सहकारी चळवळ वाचवण्यासाठी चाल कासवाची पण भरोशाची हवी, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.
सोमवारी कुंभी कासारीचे सहकारी बँकेच्या संभाजी नगर येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री आबीटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, बँकेचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अजित नरके उपाध्यक्ष अरुण पाटील, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहूल खाडे,सीईओ डी.एस.राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नामदार आबीटकर म्हणाले घरण्यावर सभासद,कर्जदार,ठेवीदारांचा विश्वास.अध्यक्ष अजित नरके यांनी भविष्यातील बँकेच्या आर्थिक सक्षमीकरणाचे नियोजन केले असल्याने कष्टकऱ्यांच्या ठेवी सुरक्षित राहणार आहेत. सर्वसामान्यांना पत निर्माण करून देणाऱ्या सहकारी बँका वाढवण्याची गरज असल्याचे आबीटकर यांनी सांगितले.
आमदार नरके म्हणाले शेतकरी कष्टकरी डोळ्यासमोर ठेवून स्व.डी.सी.नरके यांनी कुंभी बँकेची स्थापना केली. शेतकऱ्यांनी पैशासाठी सावकाराच्या दारात जाऊ नये ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. कार्पोरेट बँकांप्रमाणे कुंभी बँकेने ग्राहकांना सुविधा दिल्या आहेत. नरके घराण्यावर विश्वास असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होते. जिल्ह्यातील सहकार महर्षी मुळे ग्रामीण भागातील आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकास झाला.अनेक सहकारी बँका इतर बँकेत विलनीकरण होत असताना कुंभी, यशवंत बँकाचे दैदीप्यमान वाटचाल आहे. या बँकातून आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून आर्थिक मदत करून बेरोजगार युवकांना संधी दिली आहे. इतर जिल्ह्यातही कुंभी बँकेने शाखांचे जाळे निर्माण करावे असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष अजित नरके म्हणाले शेतकरी,सर्वसामान्यांच्या ठेवीवर कुंभी बँकेचा भक्कम पाया आहे. यावर्षी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षे असून संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद कर्जदार यांच्या सहकार्यातून यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे अजित नरके यांनी सांगितले. यावेळी बँकेचे सर्व संचालक, कुंभी कासारी कारखान्याचे सर्व संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार अरूण पाटील यांनी मानले.


