युवकांनी सामाजिक बांधिलकी, राष्ट्रनिर्मिती व शाश्वत ग्रामविकासात सक्रिय सहभाग घ्यावा- डॉ. ज्योती जाधव
कोल्हापूर (प्रतिनिधी) युवकांनी सामाजिक बांधिलकी, राष्ट्रनिर्मिती व शाश्वत ग्रामविकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या प्र कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी केले.
महावीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कंदलगांव येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी शाश्वत विकासातील युवक-युवती या विषयावर डॉ. ज्योती जाधव बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अद्वैत जोशी होते.
शैक्षणिक क्षेत्रातील विविध शिबिरे आणि चळवळींमध्ये युवक- युवती आज आघाडीवर असल्याचे दिसून येते. युवतींनी स्वसबलीकरणावर भर द्यावा. शिबिरातील छोट्या छोट्या कृतीमधून प्रेरणा घ्यावी. असेही त्या म्हणाल्या.
प्राचार्य प्रा. डॉ. अद्वैत जोशी अध्यक्षीय भाषणात म्हणले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी चळवळ असून श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि सेवाभाव विकसित होतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अंकुश बनसोडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्या श्रीमती श्वेता परुळेकर यांनी करून दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरदार माने यांनी मनोगत व्यक्त करताना महावीर महाविद्यालय व ग्रामपंचायत कंदलगाव यांच्या संयुक्त प्रयत्नातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामपंचायत कंदलगावचे सरपंच राहुल वसंत पाटील यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तन्वी नलवडे व राजलक्ष्मी शिंदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रदीप गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास सचिन बराटे, प्रा . रविदास पाडवी, प्रा. जयवंत दळवी, डॉ. महादेव शिंदे, डॉ. शशिकांत अन्नदाते, प्रा. अंकित पोरवाल, श्रीमती सुषमा चौगुले, श्रीमती प्रियांका जाधव, आदी प्राध्यापक वृंद, श्रीमती योजना दुर्गुळे, श्री. राजाराम कुंडलिक पांढरपळे, श्री. संग्राम रामचंद्र पाटील, श्री. पांडुरंग घोलप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


