लक्ष्मीबाई जरग विद्यालयात पहिलीचे विक्रमी प्रवेश…. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच प्रवेशासाठी रांगा
मनपा. श्रीम. लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर ,जरगनगर, कोल्हापूर प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते प्रवेश अर्जांचे वितरण करून पत्रकारितेला मानवंदना,
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी प्रवेश हाऊसफुल्ल झाले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्याच दिवशी शाळेतून इयत्ता पहिलीचे तब्बल 431 प्रवेश अर्जांचे वाटप वर्षभर शाळेच्या प्रसिद्धीमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. तर इयत्ता दुसरी ते सातवी साठी 148 नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आदल्या दिवशी सकाळी साडेपाच वाजल्यापासून म्हणजे जवळपास 28 तास अगोदरच पालकांनी प्रवेशासाठी रांग लावली होती. शिष्यवृत्तीसाठी आपला जरगनगर पॅटर्न म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम वर्षभर राबवले जातात. शाळेने विक्रमी 2550 इतका पटसंख्येचा अंक पार केला आहे.
घड्याळाकडे न पाहता विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे लक्ष,स्पर्धा परीक्षांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, कला, क्रीडा सांस्कृतिक अशा विविध अंगाने विद्यार्थ्यांची होणारी चौफेर प्रगती पाहून शहराच्या सर्वच भागातून आणि ग्रामीण भागातूनही पालकांचा प्रवेशासाठी ओढा अधिकच या शाळेकडे वाढत आहे.
आज गुढीपाडव्या दिवशी पालकांनी प्रवेश निश्चित करण्यासाठी सकाळपासूनच वर्णी लावली होती. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात प्रवेश प्रक्रिया पार पडली.प्रवेश प्रक्रियेच्यावेळी प्राथमिक शिक्षण समिती प्रशासन अधिकारी मा.डी .सी. कुंभारसो, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व लक्ष्मीबाई जरग यांच्या प्रतिमेचे पूजन आणि शाळेची नाविन्यपूर्ण गुणवत्तेची गुढी उभा करून करण्यात आली. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका डॉ. सुषमा जरग, श्री. विजयसिंह खाडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष जरग ,प्रशांत जरग, जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग , अर्जुन जरग,अनिश जरग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाटील , व्यवस्थापन समिती सदस्य, मा.शैक्षणिक पर्यवेक्षिका विमल गवळी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील, युवराज सरनाईक यांनी स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा सोनाळकर, संजयकुमार देसाई यांनी केले. तर आभार सहदेव कांबळे यांनी मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद सेवक उपस्थित होते.


